Sunday, October 23, 2011

दिवाळी पहाट



अजून झुंजुमुंजू झालेलं नाही, सरता अंधार गोधडीत गुरफटून झोपवतोय आणि आजीचा मऊ सायीचा हात गालावरून फिरत गुदगुल्या करतोय, ती म्हणतेय, “उठा आता चिऊताई. तिकडे मंदिरात विठू वाट पाहतोय तुमची. काकड्याला जायचंय ना?” काकडा म्हटलं की झोप पळून जाते कुठल्या कुठे. आजीच्या लुगड्याची मउशार गोधडी बाजूला सारून टुणकन उडी मारून एक एक करत सगळ्या –चिमणे-चिमण्या उठतात आणि परसातल्या चुलाण्याच्या उबेत बसून मुखप्रक्षालन, स्नानादि नित्यकर्मे उरकून निघतात आजीसोबत मंदिरात. कुणी फुलांची परडी घेतलीय, कुणी रांगोळीचा डबा, कुणी कुंकवाचा करंडा, कुणाच्या हाती तेलवातीची समई तर कुणी तुपाचं निरांजन. सगळी वरात मंदिरात पोहोचतात, विठ्ठलाची काकडआरती, अभ्यंगस्नान, साग्रसंगीत पूजा होते. “काकडा झाला, हरीचे मुख प्रक्षाळा” च्या सुरात चिमणे सूर मिसळतात, मंदिराच्या पायऱ्यांपासून ते सभामंडपात रांगोळ्यांच्या सजावटी होतात, तीर्थ-प्रसाद घेऊन घर गाठेपर्यंत सूर्यनारायण पडद्यातून डोकावणाऱ्या चिमुकल्यासारखे हळूहळू दर्शन देत असतात.
घरी येताच मावश्या-मामीने सगळी जय्यत तयारी केलेली असते, ताज्या गोमयाने सडा-सारवण झालेलं असतं, त्याचा गंध घरभर घुमत असतो. आजोबांनी भल्या मोठ्या देवघरात दाटीवाटीनं बसलेल्या देवांना अभ्यंगस्नान घालायला सुरुवात केलेली असते. परसबागेतल्या प्राजक्त, गोकर्ण, बकुळी, जाई-जुई, सोनचाफा, देवचाफा, गणेशवेल, जास्वंद अशा विविधरंगी फुलांनी भरलेली भली मोठी पितळी परडी सोन्यासारखी चकाकत असते. पूजा, आरती, नैवेद्य सगळं साग्रसंगीत झालं की आजोबा ओसरीत आले की स्वयंपाकघरात फराळाच्या बशा भरायची लगबग सुरू होते. चकल्या, चिवडा, चिरोटे, करंज्या, कितीतरी प्रकारचे लाडू, शंकरपाळे, कडबोळी यांसोबतच काहीतरी गरम हवंच, म्हणून खमंग सांजा भाजला जात असतो.
इकडे ओसरीत घातलेल्या बैठकीवर काकाआजोबा सूर लावत असतात मनातल्या मनात. मग आजोबांचा भरदार आवाज घुमतो, ‘हं दिवाकरा, होऊन जाऊ दे!’ काकाआजोबा वाटच पहात असतात. ते आपल्या सुमधुर आवाजात गायला लागतात “ऊठ पंढरीच्या राजा, वाढवेळ झाला | थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला’ आणि सुरू होते एक सुरेल, अमृतहुनी गोड दिवाळी पहाट! आकाशपटलावर उमटलेला बालरवी, वाऱ्याच्या वेणूचे सुगंधी सूर, कडेवर सोन्यासारखी चकाकणारी घागर घेऊन उभी असलेली चंद्रभागा, हाका देणारा पुंडलीक, हाती निरांजन घेऊन आरतीसाठी वाट पाहणाऱ्या राही-रखमाबाई हे चित्र डोळ्यांपुढं उभं करणारं ते अप्रतिम गीत अगदी हुबेहूब साकारावं तर काकाआजोबांनीच! तोवर फराळाची सिद्धता करून महिलामंडळ ओसरीत आलेलं असतं आणि आता मोहरा असतो माईमावशीकडे. ‘मायबाई, चला, आता तुमची सेवा रुजू करा.’ आजोबांनी सांगितलं की माईमावशी तिचं सगळ्यांत लाडकं गाणं सुरू करते, ‘चल ऊठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली | बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली’ मंदावलेला शुक्रतारा, हळूच येणारा मंद पहाटवारा एक एक चौकट जिवंत होतेय! माईमावशीचा राजूदादा हळूहळू चेष्टेच्या मूडमध्ये येतो. तिचं गाणं संपलं की ‘एक मिनिटाच्या विश्रांती’सारखा तो बोलतो, ‘हो, त्या कधीच न झोपणाऱ्या देवाला मारे गाणी म्हणून जागवा आणि मी झोपलो तर ‘गधड्या, उन्हं तोंडावर आली, तरी उकीरड्यावर गाढव लोळावं तस्सा लोळत पडलास! उठतोस की ओतू पाणी तोंडावर?’ असं बोलून उठवा!’ यावर सगळेच हसायला लागतात. अप्पांना तोंडातला चिवड्याचा बकाणा सावरत हसणं कठीण होतं. मामाला हसता हसता ठसका लागतो. आजोबा माईमावशीला म्हणतात, ‘मायबाई, उद्यापास्न त्याला पण गाणं म्हणून उठव बरं!’ कसाबसा चिवडा घशाखाली उतरवून मोकळे झालेले अप्पा त्यावर म्हणतात, ‘दादा, तो झोपेच्या बाबतीत इतका बेशरम आहे की भूपाळीला अंगाई समजून अजून हातपाय ताणून पसरेल!’ अजून एकदा हास्याचे फवारे उडतात आणि मग नसलेला माईक जातो अप्पांकडे. अप्पांचं दैवत कुमार गंधर्व! ते आपल्या दैवताचं स्मरण करून गायला लागतात, ‘मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला | स्वीकारावी पूजा आता, उठि उठि गोपाळा’ एकसुरात सगळेच कोरस देतात. आप्पा एकलव्याच्या एकाग्रतेनं गुरुमूर्ती डोळ्यांपुढे आणून एकतान होऊन गातात ‘रांगोळ्यांनी कडे सजविले रस्त्यारस्त्यांतुन | सानपाउली वाजती पैंजण छुनूछुनू छुनछुन’ सुरांच्या संगतीत दिवाळी पहाट उजळत जाते.
आता नंबर लागतो नव्यानंच गृहप्रवेश केलेल्या मामीचा. सात बहिणींचा एकुलता एक लाडका भाऊराया आणि त्याची त्याच्यापेक्षा जास्त लाडकी सहधर्मचारिणी. मामा सुरू करतो ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला | उठि लवकरि वनमाळी, उदयाचळी मित्र आला’ त्याच्या सुरात सूर मिळवून येणारा मामीचा सुरेल आलाप ऐकून कान-मन तृप्त होतात! ‘आनंदकंदा प्रभात झाली’ वर सगळ्यांच्या माना डोलत असतात. गोठ्यातली सगुणा गाय, तिचा चिमुकला गोऱ्हा रवंथ विसरून स्वरमोहिनीत गुंगले आहेत. पाखरांची किलबिल सुद्धा शांत झालीय आणि तीही दाणे टिपायचे सोडून सूर टिपताटिपता आस्वाद घेताहेत या रम्य पहाटेचा! मग पुन्हा एक छोटीशी विश्रांती. शेंडेफळ विद्यामावशीची अनन्या आजोबांच्या शेंडीशी खेळत त्यांना विचारते, ‘आजोबा, पण देव तर कधीच झोपत नाही, असं आजी म्हणते ना! मग त्याला जागं कशाला करायचं?’ सुलूमावशीचा मन्या पण तिची री ओढतो, ‘हो ना. देव कुठे झोपतो?’ मग आजोबा समजावतात, ‘अरे मुलांनो, आपल्यासाठी देव म्हणजे आपला सखा-सोयरा असतो. तो कुणी खूप कडक, रागीट पंतोजी नसतो. म्हणून आपण जे करतो, ते सगळंच देवही करतो असं आपण समजतो. देव पवित्र असतो ना, मग तरीही आपण त्याला अंघोळ घालतो ना? तो खात नाही, तरी त्याला नैवेद्य देतो ना? तसंच हे झोपवणं आणि जागवणं असतं. चला, आता आपण सुलूची भूपाळी ऐकू या.’ सुलूमावशी इतकी अप्रतिम गाते, की संधी मिळती तर आकाशवाणीवर गेली असती! तिची लाडकी भूपाळी ‘जाग रे यादवा कृष्ण गोपालका | फिकटल्या तारका, रात सरली’ पुन्हा एकवार सूर मनाचा ताबा घेतात. ‘उठुनी गोपांगना करिती गोदोहना | हर घरी जणू सुधाधार झरली’ ही सुधाधार सगुणेच्या कासेतून झरतेय, दुर्पदा तिची धार काढतेय गोठ्यात. सुरांच्या धारांनी तृप्त झालेली सगुणा नेहमीपेक्षा जास्त दूध देते!
खोटाखोटा माईक आता बाबांच्या हातात येतो. ‘ऊठ ऊठ पंढरीनाथा, ऊठ बा मुकुंदा | ऊठ पांडुरंगा देवा, पुंडलीक वरदा’ बाबांच्या आवाजात एक आर्तता आहे. असं वाटतंय की आत्ता तो पांडुरंग समोर येऊन उभा ठाकेल! ‘देह भाव मिळुनी केला काकडा मनाचा | निघुन धूर गेला अवघ्या आस वासनांचा | ज्ञानज्योत चेतविली ही उजळण्या अवेदा’ काही कळत नाहीय शब्दांतलं, अर्थातलं पण एक विलक्षण अनुभव घेतंय मन! ही शब्दांची की स्वरांची मोहिनी कळत नाही, प्रवाहात वहात जाताहेत सगळेच! सरूमावशी आईला इशारा करते आणि आई संत सखुबाई होऊन गायला लागते, ‘ऊठ बा विठ्ठला ऊठ रखुमापती | भक्तजन ठाकले घेउनी आरती’ दारी वाजणारा चौघडा, घडा घेऊन आलेली चंद्रभागा, लालिम्यात आकारलेला अरुण, विठूच्या कंठ्यात कौस्तुभात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब सजीव रूपात दिसायला लागतं. आणि शेवटी ‘जाग मनमोहना, नीज घ्यावी किती’ हा लाडिक प्रश्न! ही पहाट सरूच नये असं वाटतं!
राजूदादाला पुन्हा चेष्टा करायची हुक्की येते. ‘अरे, तो विठू कधीच उठला. आता बाकीच्या देवांना उठवा ना!’ मामाही त्याची री ओढतो, ‘अरे खरंच ना. तेहतीस कोटी देव आहेत ना आपल्याकडे. मग एकट्या विठूच्याच मागे का लागताय सगळे?’ हास्याचे कल्लोळ उसळतात, आणि ते सरायच्या आधीच सरूमावशी मैफलीचा ताबा घेते, ‘उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्वदिशा उमलली | उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माउली’ चराचराला जिंकून घेत अरुणप्रभा उजळलेली असते आतापर्यंत. फराळाचा जवळजवळ फज्जा उडालेला असतो आणि आजी खरंच सगळ्यांसाठी धारोष्ण दुधाचे पेले घेऊन आलेली असते. तिचा सूर अजून आलेला नसतो मैफलीत. सगळे आजीच्या मागे लागतात. आजी सरळ सूर्यालाच उठवते. ‘उठा उठा हो सूर्यनारायणा | थांबली सुवासिनी पूजना’ आजीचा आवाज आसमंतात घुमतो. आजीचं गीत रंगत जातं, तसंतसं आभाळही रंगत जातं. किरणहार गुंफत सूर्यनारायण आकाशात अवतरतात. मीनामावशीच्या बाळाच्या जावळासारखी कोवळी उन्हं अंगणात नाचायला लागतात. मग त्या चिमुकल्याचं पार्सल आजीकडे सोपवत मीनामावशी मैदानात उतरते. ‘उठि गोविंदा उठि गोपाला उष:काल झाला | हलके हलके उघड राजिवा नील नेत्रकमला’ जसं काही हे गाणं त्याच्यासाठीच असावं, अशा थाटात आजीच्या मांडीवर हालचाली सुरू आहेत. इवलं गाठोडं हळूहळू डोळे उघडून इकडेतिकडे बघतंय. आईचा आवाज कानात भरून घेतंय. ‘गोठ्यामधले मुके लेकरू पीत झुरुझुरू कामधेनुला | किती आवरू भरला पान्हा, हसली अरुणा तव आईला’ हसत हसत आजी मीनामावशीचा कान्हा तिच्याकडे सोपवते, तो चिमुकल्या ओठांनी चुरुचुरु पान्हा रिता करतो. आजीच्या डोळ्यांत कौतुक ओसंडून वाहतंय.
कुंदामावशीची अर्चना नुकतीच गाणं शिकायला लागलीय. तिचा वाढदिवसही दिवाळीत येतो. यावर्षी तिला दिवाळीची आणि वाढदिवसाची भेट म्हणून सगळे मिळून बाजाची पेटी घेऊन देणार आहेत. दरवर्षी प्रत्येक नातवंडांच्या वयाप्रमाणे पुस्तकांची भेट मिळते आजोळाहून. मला यावर्षी गाण्यांची पुस्तकं मिळणार आहेत. ती गाणी पाठ करून पुढच्या वर्षीच्या दिवाळी पहाटेला म्हणायची आहेत. अर्चनाला आग्रह सुरू आहे गाण्याचा. ती थोडी बावरतेय, पण सगळी मंडळी घरचीच आणि कौतुक करणारी. ती माणिक वर्मांची पंखी आहे. त्यांची गाणी तिला जिवापाड आवडतात. ती दबक्या आवाजात आलाप घेत हळूहळू मोकळी होतेय, ‘ऊठ राजसा घननीळा | हासली रे वनराणी’ यमुनेचा गार वारा जसा काही येतोय झुळझुळ करत अंगणात! गोकुळ जागं झालंय, पाखरं किलबिल करायला लागलीत. ‘उडे थवा पाखरांचा गात गात मंजुळ गाणी’ या मंजुळ गाण्यांनी वातावरण भारून गेलंय. अर्चनानं सुरेख गाऊन टाळया मिळवल्या आहेत, ‘हिच्या गाण्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हं’ असं कुणी जाहीर न करताही!
भल्या पहाटे उठल्यानं थोडीशी आळसावलेली मी काकीआजीच्या मांडीवर डोकं ठेवून पाय पसरते. ‘अरे दिवाकरा, तू सुरुवात केलीस, पण तुझी अर्धांगिनी राहिलीच ना!’ आजोबांनी आठवण करून दिल्यावर सगळे काकीआजीकडे वळतात.  ‘हो की ग वीणा, तू कशी विसरलीस? म्हण बरं तुझी आवडीची भूपाळी.’ आजी म्हणते. काकीआजी माझ्या केसांतून हात फिरवत गायला लागते, ‘ऊठ राजसा, उठी राजिवा अरुणोदय झाला | तुझियासाठी पक्षिगणांचा वाजे घुंगुरवाळा’ काकीआजीचा आवाज काय सुरेल आहे! नावासारखीच आहे काकीआजी, सूरमयी! विंझणवाऱ्याचा ताल वाजतोय, हसऱ्या उषेचे पैंजण रुणुझुणू घुमताहेत. काकीआजी अप्रतिम गातेय. ‘बालरवीचे किरण कोवळे | दुडूदुडू येतील धावत सगळे | करतिल गालावरती तुझिया मोरपिसांचा चाळा’ माझ्या गालावर काकीआजीचा पदर असाच मोरपिसासारखा फिरतोय. आणि कानात तिचा सूर. धन्य झालेत सगळे!
‘अग मंदाताई, तो गणपती राहिलाय ना अजून उठायचा. तुझी भूपाळी ऐकल्याशिवाय उठणार नाही म्हणून हटूनच बसलाय बघ.’ मामा मंदामावशीला कोपरखळी मारतो. ‘अरे, उठला नाही, तर बसेल कसा? हटून लोळतोय म्हण हवं तर!’ बाबांच्या या बोलण्यावर पुन्हा एकवार हास्याची कारंजी उडतात आणि मंदामावशी आळवून उठवते गणपतीला. ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती | अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपती’ देवघरातल्या गणेशाच्या मूर्तीवर चढवलेलं लालभडक जास्वंदाचं फूल रक्तवर्ण कमळ भासायला लागतं तर हिरव्यागार ताज्या दुर्वांची जुडी पाचूच्या किरणांसारखी दिसते. याक्षणी चौदा विद्या इथं आरती घेऊन उभ्या आहेत आणि सगळा देवलोक या घरावर छत्रछाया धरून आशिर्वादाचं अमृत शिंपतोय असं काहीसं वाटतंय. ही दिवाळी पहाट आयुष्यभर संपूच नये, असंही मनात येतंय. पण आता समाप्ती करायला हवीय. संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे, त्याची तयारी करायची आहे सगळ्यांना. महिला मंडळ स्वयंपाकाच्या तयारीला लागेल. आम्ही मुलं मळ्यातून आणलेल्या झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची सुंदर तोरणं करायला लागू. सगळी बाबा मंडळी बाकीची कामं करतील, आजोबांसोबत मळ्याची चक्कर मारतील. मामा आणि राजूदादा फटाके आणायला जातील. लक्ष्मीपूजन आणि संध्याकाळची जेवणं झाली, की दिवाळी पहाटेसारखीच संगीतरजनीची पर्वणी साधायची आहे ना!
दरवर्षी येणारी दिवाळी आजोळच्या या दिवाळी पहाटेच्या आठवणींचा खजिना घेऊन येते, जो वर्षानुवर्षे रिता होणार नाही. या सगळ्या भूपाळ्या आनंदाचा अनमोल ठेवा आहे, जो साथ देईल अखेरच्या श्वासापर्यंत! ते सूर घुमत राहतील मनाच्या घुमटात पारवा घुमावा तसे. आज त्यातले कितीतरी सूर कुठे दूरवर गेले आहेत, पण त्यांच्या स्मृती आजही काळाच्या नजरेपासून लपवल्या आहेत मनानं. शिंपल्यात मोती रहावा, तशा काळजाच्या मखमली पेटीत राहिल्या आहेत त्या, कधीच न विसरण्यासाठी.

[पूर्वाप्रकाशन - जालरंग प्रकाशनाचा ई-दिवाळी अंक दीपज्योती २०११]

Tuesday, August 23, 2011

गावझुला - लेखक श्याम पेठकर

http://www.maayboli.com/node/27732

या स्पर्धेसाठी केलेलं लेखन

रसग्रहण
गावझुला [दीर्घ ललितबंध]
लेखक : श्याम पेठकर
विजय प्रकाशन, नागपूर.
प्रथमावृत्ती १७-१०-२००९
किंमत :- २५० रुपये.
कुठलंही आखीवरेखीव, साचेबंद कथानक नाही, कसलेही ठसे मिरवणारी पात्रं नाहीत, नात्यातले ताणतणाव, वादविवाद नाहीत, ठराविक सीमांनी बांधलेली ठिकाणं नाहीत. केवळ एका बैराग्याच्या गावोगावच्या भ्रमंतीत साकारलेलं एक विलक्षण भावनाट्य म्हणजे गावझुला. ४३ लघुललितबंध मिळून झालेला हा एक दीर्घ ललितबंध. साप्ताहिक लोकप्रभामध्ये गावझुला या सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखनाचा हा बंध. जरी  प्रत्येक लघुललितबंधाला क्रमांक दिले आहेत, तरी प्रत्येक ललितबंध स्वतंत्र अनुभूती देणारा आहे.
ज्यांच्या पावलांचे ठसे अंतरी जपावे, त्यांच्या खुणा शोधत, मागोवा घेत जाण्याचा अयशस्वी का होईना, पण जरासा प्रयत्न करावा, आणि आपोआप सगळ्या बंद वाटा उलगडत जाव्यात, अशी काही बोटावर मोजण्याइतकी व्यक्तिमत्वं असतात, त्यातलंच एक त्या बैराग्याचं. रात्री धुरकटलेल्या कंदिलाच्या काचा सकाळी उजळत असता अवचित भेटलेल्या गुरूंच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत घरदार सोडून जगाच्या कल्याणा निघालेला हा कलावंताच्या लांब, निमुळत्या बोटांचा विलक्षण अवलिया, त्याला त्याच्या भ्रमंतीत भेटलेल्या व्यथा-वेदनांची लक्तरं आपल्या देहावरील चिंध्यांच्या झोळण्याला बांधत जातो. जिथं जातो, तिथं कुणीतरी आधीच मांडलेला दु:खाचा पसारा आवरत जातो, सुखाचे जोंधळे वाटेवरच्या पाखरांसाठी पेरत जातो. सुरेल गळ्याच्या आईच्या घुसमटून गेलेल्या गाण्याच्या शोधात तिचंच भाकरी देण्याचं व्रत स्वीकारून फिरत रहातो, ‘भंगलेल्या चित्रांच्या चौकटी, तारा तुटलेला तंबोरा अन् पाकळ्यांवर कोरलेली काही स्वप्नं’ मागं ठेवून!
गाव हा त्याचा जिव्हाळ्याचा बंध, भलेही तो कुठल्या गावाचा होऊन रहात नाही. गावक-यांनी गावाचं गावपण जपावं, मातीशी इमान राखावं, हे तो उक्तीतून नाही, तर कृतीतून सांगतो. ‘गावाचं महानगर होणं म्हणजे विकास नव्हे, ते गावाचं संपणं आहे, हे कळण्याइतपत चार शहाणी माणसं गावात असावी लागतात. गावाने आपली माती जपावी अन् आभाळाला यश द्यावं’ एवढी त्याची माफक अपेक्षा. या भ्रमंतीत कितीतरी गावं त्याच्या चरणधुळीनं पावन होतात, कुठल्याशा अघोरी, विचित्र, विक्षिप्त, अमानवी रुढी-परंपरांचा, अंधश्रद्धांचा अजगरी विळखा हिमतीनं दूर सारून याच्या पावलांचं तीर्थ घेण्यासाठी धावत येतात, पण तोवर हा दूर कुठे निघून गेलेला असतो, पुढचा गाव गाठायला. त्याला कसल्याच मायेत गुंतायचं नाहीय. ‘आपल्याला उमगले तेच सत्य या भासात जगण्यात गुरफटणं म्हणजेच माया’ हे जाणून तो गुंते सोडवीत नवनवी सत्ये शोधत पुढे निघून जातो.
त्याच्या वाटेत येणारी गावंही आगळीवेगळी. तसे तर गावांचे चेहरेमोहरे इथून तिथून सारखेच असतात, पण तरीही आपलं वेगळेपण प्रत्येक गाव जपत असतं. पुरूष गाळणा-या स्त्रियांचं गाव, मर्यादा हे ज्यांचं अस्त्र आणि मार्दव ही ज्यांची पूजा आहे, अशा स्त्रियांचं गाव, गावप्रमुखाच्या दु:खानं अस्वथ होणारं गाव, दगडांच्या देवाला दगडानंच पूजुन, त्याच्यापुढे जनावरांचे बळी देऊन त्यांच्या रक्तामांसाचा चिखल होऊन संपणारं गाव, नवसासाठी दगडाच्या मूर्तीला सोन्याचे डोळे लावून पार आंधळं झालेलं गाव, काही मुक्यानं सोसणारी तर काही वासनांच्या जंजाळात गुरफटून माणूसपण विसरलेली, नवस-सायास, अंधश्रद्धा, भ्रष्ट, अघोरी उपायांनी माणुसकीला काळिमा फासणारी गावं, त्यांत भेटणारे संत-महंत आणि शोधूनही न भेटणारी माणसं या भ्रमंतीत पावलोपावली दिसतात. हा बैरागी भुकेच्या क्षणी कधी मिळालेल्या तर कधी न मिळालेल्या भाकरीच्या बदल्यात, कुठलीही जाहिरात न करता, कुठलाही गाजावाजा न करता केवळ कृतीतून श्रमदानाचं महत्त्व दाखवून देतो. कसल्याही चमत्काराशिवाय, कशाचंही अवडंबर न माजवता माणसातील  माणूसपण जागवत रहातो. आश्रम, सत्संग, उपदेश, यांच्याविनाही अध्यात्म जगतो.
त्याची गुरुभेट ही देखील विलक्षण! सुरुवातीला त्याला प्रत्यक्ष भेटलेले त्याचे गुरू पुढे मात्र त्याला वेगवेगळया रूपात अप्रत्यक्षरीत्या भेटत रहातात, कधी केवळ वाणीतून तर कधी विचारांतून. कधी तर केवळ त्यांच्या पाउलखुणा कुठेतरी जाणवतात. पण सदोदित गुरू मनात वास करत असतात त्याच्या.
तुका म्हणे होय मनाशी संवाद | आपलाची वाद आपणांसी
असे ते गुरूंचे उपदेश असतात. तोही असंख्य प्रश्न विचारत रहातो, कधी आपली निरागसता हरवत नाही, तिला जपत रहातो, कारण गुरूंनी त्याला सांगितलं आहे, ‘शैशव राखतो तो शिष्य. शैशवातले निरागस प्रश्न संपले की शिष्यत्वही संपतं.’ कित्येकदा असंही वाटतं, की गुरू ही संकल्पना त्याच्या मनातलीच असावी.
माथा ठेवू कोण्या पायी? माझा गुरू माझे ठायी
असं काहीसं! आई कळायला अन् गुरू अनुभवायला मोग-याचं काळीज लागतं.’ ही जाण जपणारा हा बैरागी आपल्या भ्रमंतीत कुठेही न गुंतता इतरांच्या आयुष्यातला गुंता सहजी सोडवून देतो. माणसाचे पाय जमिनीवर हवेत, ही नेहमीची संकल्पना त्याला मान्य नाही, तो म्हणतो, ‘जमिनीवर पाय नव्हे, हात हवेत. कर्तृत्व क्षयग्रस्त झालं की मग चमत्काराची अपेक्षा केली जाते. ज्याचे हात जमिनीवर असतात, त्याचं कर्तृत्वही बुलंद असतं.’ हा त्याचा विश्वास. ‘या जगातली सगळीच नाती शरीरसंबंधातून किंवा शरीरसंबंधासाठी निर्माण झालेली असतात. मित्र हे एकमेव मनाचं मनाशी असलेलं नातं आहे.’ ही त्याची श्रद्धा. पुनर्जन्माची त्याची व्याख्या पुनर्जन्माच्या नेहमीच्या कल्पनेला छेद देणारी सरळ, साधी. ‘प्रत्येक श्वासाशी आपण मरतच असतो, पुढचा श्वास म्हणजे पुनर्जन्मच.’ हे असं सहज तत्वज्ञान मांडत जगणारा हा बैरागी शब्दांच्या जंजाळात अडकत नाही, कारण त्याच्या लेखी ‘शब्द म्हणजेही अखेर भावनांचा आकारच.’ म्हणून हा त्या शब्दब्रम्हाच्याही पलीकडला! शब्दांत वर्णिता न येणारा, पण या ललितबंधात निराकारातून साकार झालेला. अतिशय ओघवत्या भाषेत झुलणारा हा गावझुला वाचकाला, रसिकाला खिळवून ठेवतो. एक अनोखं गारूड आहे या कहाणीत, जे कल्पनेच्याही पलिकडच्या विश्वात घेऊन जातं आपल्याला. प्रत्येकाच्या मनात वसलेलं गाव, गावाकडची माती, तिथली नातीगोती, प्रथा, व्यथा सगळ्या आपल्या होऊन जातात आणि माणुसकीचा अलख जागवीत सृजनाची शिंपण करत गावोगाव फिरणा-या त्या अवलियाच्या मागे आपणही फिरत रहातो. चि. त्र्यं. खानोलकर, श्री. ना. पेंडसे, जी. ए. यांच्या साहित्यातली गावं, पात्रं जशी पिंगा घालत रहातात, अगदी तशीच या झुल्यातली निनावी पात्रं, अनोळखी गावं आपल्या स्वभाववैशिष्ट्यासह मनात रुंजी घालत झुलत आणि झुलवत रहातात.
या विलक्षण मनोव्यापाराचे चित्रण करणारे लेखक श्री. श्याम पेठकर यांच्याशी जेव्हा या पुस्तकासंबंधी चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या संबंधात ऐकलेली एक दंतकथा सांगितली, डेबू शेतात राखण करत असताना एक साधू त्याच्याकडे आला. डेबूनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी तो तिथेच ठिय्या मांडून बसला, त्यानं गरम गरम पानगे रांधून डेबूला खाऊ घातले आणि तो निघून गेला. पुढे दुस-या दिवशी डेबू काही कामानिमित्त गावाबाहेर गेला असता साधू गावात येऊन त्याची चौकशी करत होता, तर गावक-यांनी त्याला चोर-डाकू समजून हाकून लावला. डेबूला जेव्हा हे समजलं, तेव्हा तो त्या साधूच्या शोधात गाव सोडून निघून गेला. हाच डेबू म्हणजे संत गाडगेबाबा. या दंतकथेनं प्रेरित होऊन लेखकानं हे ललितबंध गुंफले. हे गाडगेबाबांचं चरित्र नाही, किंवा त्यांच्या चरित्रावर आधारित कहाणी नाही, हे बंध आहेत त्या व्यक्तिमत्वाचं अंतरंग उलगडण्याचा, त्याच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न.
आपल्याच मनातल्या द्वंद्वाची गाथा असावी तसे हे बंध एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणतात. ‘त्या भिंतीमधल्या खिडक्या मात्र सौभाग्यवती जख्ख म्हातारीसारख्या हसतमुख.’ ‘अपेक्षांचा पांगुळगाडा न लावता जे काम केलं जातं ती पूजा असते.’ ‘पावलं नेहमीच प्रश्नात अडकलेली असतात. म्हणून त्यांचा आकार प्रश्रचिन्हांसारखा असतो.’ अशी सहज भाषा, सुभाषितं असावीत, तशी प्रासादिक वाक्यरचना, ब्लर्बवरची म. म. देशपांडे यांची पावले ही अप्रतिम कविता, मुखपृष्ठावरचं मातीवर ठेवलेलं खापराचं वाडगं आणि बांबूच्या काठीचं रूपक ही या पुस्तकाची आणखी काही खास वैशिष्ट्ये. मनात आत खोलवर रुजत जाणारं, संग्रही असावंच असं एक अप्रतिम पुस्तक! 
[अवतरण चिन्हांतली सगळी वाक्यं पुस्तकातली आहेत.]

Saturday, January 8, 2011

एका बंदिशीची गोष्ट

         आपलं शास्त्रीय संगीत हा एक विशाल असा महासागर आहे. यातला एखादा थेंब जरी लाभला, तरी आयुष्याचं सार्थक होईल! वर्षानुवर्षंच नाही, तर तपानुतपं गुणीजन या अनमोल खजिन्यात आपल्या योगदानानं मोलाची भर घालत आहेत.

         या विषयावर मी काही लिहावं, इतका माझा अधिकार नाही. पण शास्त्रीय संगीताची एक विद्यार्थिनी म्हणून धाडस करतेय या महासागरात उतरण्याचं! सर्वसाधारणपणे असं समजलं जातं, की शास्त्रीय संगीतात स्वर, ताल आणि लय यांचं महत्त्व शब्दांपेक्षा अधिक आहे, सुगम संगीतात शब्द, त्यांचे अर्थ, भाव या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. याचा अर्थ असा मुळीच नाही, की शास्त्रीय संगीतात भाव किंवा शब्द फारसे विचारात घेतले जात नाहीत. त्याशिवाय का राग आणि रस यांचं अतूट नातं आहे? अर्थात सगळ्याच विषयांप्रमाणे याही विषयात भिन्न भिन्न मतप्रवाह आहेतच, असोत! पं अजय पोहनकरजी यांनी आकाशवाणीवरील संगीत-सरिता या कार्यक्रमात हेच सांगितलं होतं, की स्वर-ताल-लय यांप्रमाणेच भाव आणि शब्द यांचंही शास्त्रीय संगीतातलं महत्त्व कमी नाही!
        
          शास्त्रीय बंदिशींचे विषय वेगवेगळे असतात. भक्ती हा त्यातला मुख्य विषय. हीच भक्ती जेव्हा कृष्णलीला वर्णिते, तेव्हा त्या बंदिशी आपोआपच शृंगाररसाचा आविष्कार करतात. भगवान कृष्ण आणि त्याच्या लीला हा तर नुसतं संगीतच काय, पण अगदी ६४ कलांच्या असंख्य कलाकारांचा युगानुयुगे जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याशिवाय पूर्वी शास्त्रीय संगीतगायक ज्या राजदरबारात आपली कला सादर करत, त्या राजाचं गुणवर्णन, संगीताची महती, सृष्टी, जगरहाटी असे कितीतरी विषय या बंदिशींमधून मांडले गेले आहेत आणि जात आहेत. हिंदी बंदिशींमधला आणखी एक अनादि-अनंत विषय म्हणजे नाती. त्यातल्या त्यात पिया आणि सास-ननदिया हे तर अगदी खास!

          तर मी ज्या बंदिशीची गोष्ट सांगतेय, ती याच विषयावरची. या बंदिशीची नायिका म्हणजे खटल्याच्या घरातली मधली सून, जिला सासू, नणंद यांच्या सोबतच जावा [मोठ्या आणि धाकट्या पण!] आहेत त्रास द्यायला. आणि अशा रगाड्यातून पिया भेटणं हे किती जिकीरीचं आणि कठीण आहे, ते तिचं तिलाच ठाऊक! तरीही ती पियाला भेटण्याचं धाडस म्हणा की साहस म्हणा, करते आणि आपल्या सखीला त्या घटनेचा इतिवृत्तांत सांगते, ही या बंदिशीची मध्यवर्ती कल्पना! आता हे तर काही विशेष नाही ना, ज्यावर एवढं घडीभर तेल ओतायला हवंय नमनालाच! पण तरीही मी ते काम करतेय, कारण या बंदिशीतला एकेक भाव, एकेक शब्द तिच्या स्वरावलीनं पेलून धरलाय!

         ही अप्रतिम बंदिश आहे पूरिया रागातली. सायंकाळच्या कातरवेळेत गाइला जाणारा मारवा थाटातला हा सायंकालीन संधिप्रकाशी राग. [अलिकडे तो रात्रीच्या प्रथम प्रहरातही गाइला जातो.] कोमल रिषभ, तीव्र मध्यम आणि पंचम वर्जित असलेला हा अतिशय सुरेख राग. या रागातली "मैं कर आई पियासंग रंगरलियां" ही ती सुरेख आणि सुरेल बंदिश! ही बंदिश मी ऐकली ती परितोष पोहनकरजी यांच्या आवाजात. त्याच वेळी ती मला अत्यंत भावली होती. आणि नेमकी शिकतानाही तीच माझ्या पुढ्यात उभी! जन्माचं सार्थक म्हणतात, ते हेच असावं का?

         अवघ्या पाच ओळींत त्या नायिकेच्या किती भावनांचं इंद्रधनू गुंफलं आहे स्वरांनी! ही बंदिश शिकत असताना अक्षरश: त्या नायिकेच्या भूमिकेत स्वत:ला ठेवावं, इतकं एकरूप केलं त्या भावना, शब्द आणि स्वरांनी!

मैं कर आई पियासंग रंगरलियां
आलि जात पनघट की बाट ॥
स्थायीमधल्या या दोन ओळींत तिचा खट्याळ, लाजरा, हसरा चेहरा दिसतो!

मैंS कर आई पियासंग रंगरलियाSSS
मंद्र निषादापासून सुरू होणारी, षड्ज, तीव्र मध्यम, गंधार, कोमल रिषभ यांच्या साथीनं पुन्हा षड्जावरून खाली उतरत मंद्र धैवत, मंद्र निषाद, षड्ज, कोमल रिषभ अशी वर चढत मध्य षड्जावर संपणारी पहिली ओळ त्या सखीला जणु सांगतेय, की घरच्या सगळ्या कटकटी विसरून, सासू-नणंद, जावा सगळ्यांच्या नाकावर टिच्चून मी पियाशी रंगरलियां, [या रंगरलियां शब्दातलं पहिलंच अक्षर समेवर आलंय, कोमल धैवतावरची ही सम त्या रंगरलियांचं महत्त्व आणखीनच वाढवतेय!] चेष्टामस्करी, शृंगार करून आले, तो कुठे? तर
आSलि जाSत पनघट कि बाSट !
पाणी भरायच्या निमित्तानं पाणवठ्यावर जाता जाता सख्यानं मला घेरलं! मंद्र निषादावरून कोमल रिषभाचा हात धरून गंधार, तीव्र मध्यम अशा पायर्‍यांवरून वर चढत चढत मध्य निषादाला स्पर्शून गंधार आणि तीव्र मध्यमासोबत धैवताच्या भोज्याला शिवून पुन्हा कोमल रिषभावर उतरणारी ही दुसरी ओळ या लाजर्‍या न् साजर्‍या मुखड्याचा आरसाच आहे जणु! काय सुख मिळालं असेल तिला त्या अवघ्या काही क्षणांच्या भेटीत? पण तरीही ती इतकी खुललेली, फुललेली आहे की जसं अख्खं आयुष्य जगलीय त्या क्षणांत!

आता यात कसलं आलंय कौतुक? पाणवठ्याच्या वाटेवर पियाशी रंगरलियां करण्यात काय विशेष? याचं उत्तर दिलंय अंतरेत!

एक डर है मोहे सास-ननंदको,
दूजे देरनिया-जेठनिया सतावे,
निसदिन कर रही हमरी बात!
हे आहे तिचं दु:ख, तिची व्यथा! आणि म्हणून तिला पियाला भेटण्यासाठी पाणवठ्याच्या वाटेचा सहारा घ्यावा लागलाय!!

एक डर हैS मोहे साSस ननंदकोS
गंधारानं सजवलेलं तिचं दु:ख तीव्र मध्यमानं धैवतासोबत वाढवत नेऊन दिलंय तार षड्जाच्या हाती आणि त्यानं मागे वळून मध्य निषादाला सोपवलंय, पण निषादाला ते सहन न होऊन त्यानं तार सप्तकातल्या कोमल रिषभाला हाताशी धरत पुन्हा ते तार षड्जाकडे सुपूर्द केलंय! तिच्या त्या दु:खातली तीव्रता, तिचं ते घाबरणं, घुसमटून रहाणं केवळ स्वरांतून जाणवतं!
दूजे देरनीSया जेठनीSया सताSवे
या सासू-नणंदेची भीती कमी झाली म्हणून की काय, धाकट्या जावा [देरनिया] आणि मोठ्या जावाही [जेठनिया] त्रास देत रहातात.
या ओळीत मध्य निषादानं आळवलेलं दु:ख तार सप्तकातल्या कोमल रिषभानं तार गंधार आणि मध्य निषादासोबत खो-खो खेळत मध्य धैवत, मध्य निषाद, मध्य सप्तकातला तीव्र मध्यम, मध्य गंधार, मध्य सप्तकातला कोमल रिषभ यांच्या वळणावळणानं जात षड्जाच्या झोळीत घातलंय!
निसदिन कर रही हमरी बाSत!
पुन्हा मंद्रातल्या निषादानं मध्यातल्या कोमल रिषभाच्या हातात हात गुंफून, गंधार, तीव्र मध्यम, धैवत, मध्य निषादापर्यंत चढवत नेलेली तिची अगतिक कैफियत तीव्र मध्यमानं मध्य धैवत, गंधार यांच्याशी खो-खो खेळत कोमल रिषभावर आणून पोहोचवली आहे.
धाकट्या तर ठीक आहे, त्यांना काही कळत नाही, पण निदान मोठ्या जावांनी तरी समजून घ्यायला हवंय ना! त्या माझ्याच वाटेनं गेलेल्या असतील ना! पण छे! त्याही [मेल्या!] माझ्याबद्दल कुचुकुचु बोलत रहातात! हे सगळे सगळे भाव त्या सुरावटींनी इतके सुरेख आणि सुरेल मांडले आहेत, की गुंतून जायला होतं त्या बंदिशीत!

          ही बंदिश एक बंदिश न रहाता, केवळ एका रागाचं रूप जाणून घेण्यासाठी शिकलेली किंवा ऐकलेली रचना न रहाता त्या अल्लड वयातल्या त्रासलेल्या पण तरीही उत्साहानं उधाणलेल्या नायिकेची गोष्ट होते! आणि हा सारा त्या स्वरावलीचा खेळ! अतिशय अप्रतिम अशी ही बंदिश इथे ऐकायला मिळेल. ऐका, आणि जाणून घ्या तिची गोष्ट!
http://www.youtube.com/watch?v=v8bOeHRz_Kc

Saturday, January 1, 2011

सकाळनं घडवलेली सकाळ

बुधवार दि. २९-१२-२०१० ची प्रसन्न सकाळ. सकाळची थोडी कामं उरकून गरमागरम चहाच्या घोटाबरोबर पेपर चाळावा, म्हणून हॊलमध्ये आले, तेवढ्यात मोबाईल वाजला.
"हॆलो"
"आपण क्रांति साडेकर बोलताय?"
"हो. आपण कोण बोलताय?"
"मागेन एवढे मी, हातून या घडावे
काही नवे, निराळे अन् जातिवंत आता!
या आपल्या ओळी खूप भावल्या, म्हणून आवर्जून फोन केला."
तेव्हा मला लक्षात आलं की आज बुधवार, सकाळमध्ये गझल-गुंजन या सदराचा समारोप करताना माझी "माझा वसंत" ही गझल निवडली आहे असं पांचाळे काकांनी सांगितलं होतं! सकाळ विशेषमध्ये पाहिलं, तर त्या गझलसोबत मोबाईल नंबरही दिलेला.
"धन्यवाद सर, आपण कोण बोलताय?"
"तुम्हाला लगेचच दाद मिळावी, म्हणूनच मोबाईल नंबर देता ना? मिळाली ना दाद? मग मी कोण आहे हे कशाला कळायला हवं?"
"ही माझ्या काव्याला मिळालेली पहिली दाद आहे, म्हणून आपला नंबर मी सेव्ह करून ठेवेन."
"त्याचं काही एवढं महत्त्व नाही. तुमची गझल माझ्या वाचनात आली, मला ती मनापासून आवडली, तुमचा नंबर होता सोबत, म्हणून मी तुम्हाला फोन केला. बरं, कुठं असता तुम्ही? काय करता?"
"सर, मी नागपूरला बीएसएनएलमध्ये काम करते."
"अच्छा. माझाही बीएसएनएलचा दूरध्वनी आहे. तुम्ही कोणत्या कार्यालयात असता ?"
"सर, मी सक्करदरा कार्यालयात आहे. आपला कोणता एरिया आहे?"
"मी धंतोलीत रहातो." क्षणभर काही अंदाज घेण्याचा प्रयत्न करतेय, तोवर पुढचा प्रश्न आला, "आता माझं नाव सांगू? विश्वास बसेल तुमचा?"
"हो सर"
"मी ग्रेस बोलतोय."
"सर, आपण?" मी अवाक!! काहीही कळत नाहीय मला! चक्क सूर्याची काजव्याला दाद? मी स्वप्नात तर नाही? माझ्या घरातच आहे मी की चंद्रमाधवीच्या प्रदेशात?
"होय, मी ग्रेस बोलतोय. मी कधीही खोटं बोलत नाही, नागपुरात ग्रेस या नावाचा एकुलता एकच माणूस आहे, माझा कुणीही जुळा भाऊ नाही आणि माझी कुठं शाखाही नाही!"
मी काय ऐकतेय, काय बोलतेय, मला काहीही कळत नाहीय.
"सर, मला आपली भेट घ्यायची होती. पण..............."
"पण काय? तुम्ही मला शोधायचा प्रयत्न नाही केला. या गझलच्या निमित्तानं मी तुम्हाला शोधलंय, तुम्ही मला शोधलं नाहीय. मी तुम्हाला मिळवलंय, तुम्ही मला नाही मिळवलं!"
"सर, आपली ही दाद माझ्यासाठी खूप मोठी भेट आहे, आज मी खरंच खूप काही मिळवलंय."
"ते आता तुम्ही पहा! तुमची गझल मला मनापासून आवडली, मी तुम्हाला दाद दिली. मला चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला आवडतं."
"सर, मी नक्कीच आपली भेट घेईन. आपल्या कविता मला खूप आवडतात. मी आपल्या कवितांची वेडी आहे."
"अरे, असं चांगलं लिहिणारी माणसं वेडी नसतात, खूप शहाणी असतात. माझी भेट तुम्ही केव्हाही घेऊ शकता, पण एक आहे, मी कुणाला कवितांसाठी मार्गदर्शन वगैरे करत नाही. तुम्ही या, पण मार्गदर्शन मिळेल ह्या अपेक्षेनं नाही."
"काही हरकत नाही सर."
"आणि तसंही तुमचं काव्य सांगतंय की तुम्हाला या सार्‍या सोपस्कारांची गरजही नाही. कुणाच्या चार ओळींनी किंवा प्रस्तावनेनं कुणाचं काव्य मोठं होत नाही. मुळातच जे चांगलं आहे, त्याला दाद मिळणारच! तेव्हा लिहित रहा, असंच चांगलं, आतून आलेलं, मनापासून लिहा. तुमच्या काव्यप्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा."
"धन्यवाद सर."
"ठीक आहे, आता मी फोन ठेवतो. तुमचा सकाळचा बराच बहुमूल्य वेळ घेतलाय मी." आणि फोन बंद झाला.
मी अजूनही हवेत. हे सगळं जे घडलं, ते खरंच खरं होतं?
या धुंदीतून बाहेर येऊन बहिणीला [स्वातीला] फोन केला, ती बोलते, "सण आहे आज तुझ्यासाठी!"
खरंच! सणच होता तो दिवस! खुळ्यासारखी ही वार्ता लेक, बंधुराज, आई, बहिणी, सगळ्या मित्र-मैत्रिणींना सांगत सुटले आणि स्वत:चंच कौतुक करून घेत राहिले दिवसभर! एखाद्या लहान मुलानं शाळेत मिळालेलं बक्षिस दाखवत सुटावं सगळ्यांना, तस्सं!
स्वत: पांचाळे काका, तुषार जोशी, सुरुची नाईक, रूपालीताई बक्षी, स्मिताताई जोशी, गाण्याच्या क्लासमधल्या मैत्रिणी सगळे सगळे खूश झाले अगदी! विजयाताई मारोतकर म्हणाल्या, "मला तुझा खूप अभिमान वाटतो, आणि माझाही, कारण मी तुझी मैत्रिण आहे!!बघ, जाता जाता जुन्या वर्षानं तुला केवढं मोठं देणं दिलंय!" प्रमोद देवकाकांना जेव्हा हे सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, "तुझ्या या अनुभवावर एक स्फुट लिही, म्हणजे आपल्या जालावरच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही आनंदवार्ता कळेल." त्यांनी लगेचच ईसकाळ.कॊम वरचा दुवा शोधून काढला, त्यावर फक्त लेख दिसतोय, गझल दिसत नाही, म्हणून सकाळच्या संपादकीय विभागात फीडबॆकही दिला! नंतर दिवसभर सगळ्या विदर्भातून गझल आवडल्याबद्दल फोन येत राहिले, मेसेज येत राहिले, पण पहिली दाद माझ्यासाठी अमृताचा घोट होती!
या सरत्या वर्षानं मला जाता जाता जे दिलंय, ते खरंच खूप अनमोल आहे, मर्मबंधातली ठेव आहे ती माझी! वयाच्या १४व्या वर्षी प्रत्यक्ष गझलसम्राटाचं, मराठी गझलक्षेत्रातल्या शंकराचार्यांचं, कै. सुरेश भट काकांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन, आणि आज वयाच्या ४८व्या वर्षी मराठी काव्यातल्या ग्रेस नामक वलयांकित, ध्रुवतार्‍यासारख्या अढळ पदावरील व्यक्तिमत्वाचं माझ्यासारख्या कोशातल्या सुरवंटाची दखल घेणं! माझ्या आयुष्याच्या प्रवासातले हे दोन टप्पे म्हणजे मैलाचे दगड ठरले आहेत माझ्यासाठी. मी लिहीत रहावं म्हणून मला सतत प्रोत्साहन देत रहाणारे, प्रसंगी रागावणारे माझे बाबा आणि भट काका आज या जगात नाहीत, पण तरीही या प्रसंगानं ते नक्कीच समाधान पावले असतील!